Thursday, October 27, 2016

आठवणी

सतत वाटायचं
कुणी तरी हवं असं
दूर राहून ही माझं अस्तित्व
व्यापून राहणारं...

तू आलास
आणि
भरून गेल्या
साऱ्या उणिवा...

पण,
आपण एकमेकांचे नाही
या जाणीवाच
जीवघेण्या..

तसं पाहिलं तर
या आधीही आपण
नव्हतोच कधी
एकटे..
होतेच की आपल्यासोबत
आपले
'रंगहीन सोबती'...

खरं तर आपणही
स्वीकारलं होत त्यांच असं
रंगहीन होऊन
आपल्याकडे येणं,
त्यांची सोबत असूनही
आपलं एकाकी जीणं..

मग आताच का हे असं व्हावं?
त्यांच्या रंगहीनतेवर आपणच
का उभारावीत
प्रश्नचिन्हं ?

का लागली रंगांची आपल्याला अशी अचानक ओढ?
अरे, श्वास भरून आलाय
मिठी थोडी सैल सोड ...

हल्ली तूच असतोस रे सगळीकडे
जिकडे तिकडे तुझंच मार्दव लेवून..

मनात उठलेली लवलव आणि
रसरसलेलं नवं जीवन घेऊन..

रंगून जावं म्हणतेय
तुझ्याच रंगात नखशिखांत ..
तुझ्या मिठीत रीत व्हावं
करावं हे मन शांत ..

नको वाटतेय समाजाशी बांधिलकी,
आणि पर्वाही नाही
चारित्र्याची ..
कळतेय ती फक्त संयम टाळून
गात्रागात्रात सळसळणारी
रक्तपालवी...

-निकिता सु. विचारे

Saturday, October 1, 2016

आठवणी

तू म्हणजे पंचपक्वान्नाचं ताट अचानक समोर आलेलं,
मी मात्र निर्जळ व्रत आजन्म घेतलेलं...

तू म्हणजे कृष्णाच्या बासरीची धून गहरी,
मी मात्र तुझ्या कथेतील हंसीण बहिरी...

तुला हवी माझ्याकडून रूक्मिणीची प्रीती ,
मला मात्र सदासर्वदा मीरेचीच स्मृती...

तुला कवितांचा नाद तुझ्या शब्दांत गोडी,
मी तुझ्यासाठी वेडी पण पायांत बेडी...

कसा होणार मिलाप आपला समोर उभे प्रश्न किती ,
त्यातच मला सावर म्हणता म्हणता तुझ्याच पडण्याची भीती...

.............निकिता सु. विचारे